

एक पंधरा वर्षांची शाळकरी मुलगी शाळेत जाण्यास नकार देते. हा गुन्हा आहे हे माहीत असूनही तो ती करते. त्यातून जगातील लाखो मुलांना स्फूर्ती मिळते. त्यानंतरच्या घटनाक्रमाने संपूर्ण जग हादरून जाते. कोणतीही कृती छोटी नसते हेच स्वीडनच्या ग्रेटा थुनबर्गने दाखवून दिलं आहे.
नेमका ऋतू कोणता हा प्रश्न एका क्षणी पडावा तर पुढच्या क्षणी त्याचे अतिरेकी रूप पाहून भीतीने गाळण उडावी, अशी ऋतूंची दहशत जगभर पसरली आहे. हवामान संकटाने जग हवालदिल झालं आहे. आपली वाटचाल ही समूळ उच्चाटनाकडे आहे. याला जबाबदार कोण? विज्ञान व वैज्ञानिक 1965 पासूनच, ‘कर्बउत्सर्जन रोखून शून्यावर आणले नाही तर जग धोक्यात येईल’, असे इशारे देत आले आहेत. परंतु कुठल्याही राष्ट्रप्रमुखांनी या इशार्यांना मनावर घेतलं नाही. आता जग कडेलोटाला आलं आहे. ग्रेटा आणि लाखो मुले जगातील नेत्यांना व उद्योगपतींना याचा जाब विचारत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघात ग्रेटा कडाडली, “मानवजात व जीवसृष्टी नायनाटाच्या मार्गावर असताना तुम्ही पैसा व आर्थिक विकासाच्या परीकथा सांगत बसता. तुमची हिंमत होतेच कशी? तुम्ही आम्हाला फसवत आहात आणि आम्ही हे सहन करणार नाही.’’
कार्बनमुळे काळवंडून गेलेलं जग स्वच्छ व शुभ्र व्हावं, यासाठी बलाढ्य प्रदूषकाशाहीच्या विरोधातील लढ्यात आता जगातील मुलांच्या सोबतीने शिक्षक, कलावंत, वैज्ञानिक, अर्थतज्ज्ञ आले आहेत. प्रश्न आहे तो धोरणकर्त्यांचा आणि त्यांच्या कृतीचा!