

भारतीय संगीताला प्राचीन परंपरा आहे. त्यात प्रांतानुसार वैविध्य आहे. आचार-विचार-उच्चार या त्रिसूत्रीवर आधारित असे हे संगीत आहे. संगीत आणि संस्कृती यांचा अतूट संबंध असतो. संगीताला आशयाची जोड दिली जाणे आवश्यक असते. कोणत्याही प्रकारातले संगीत असले तरी त्यामधून आशय श्रोत्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असते. तसे झाले तरच त्याला लोकाश्रय मिळतो आणि ते टिकून राहते. अशा या भारतीय संगीताचा इतिहास, त्यातील परंपरा, त्याचे प्रकार या सर्वांचा मागोवा डॉ. अशोक दा. रानडे यांनी ‘संगीतविचार’ या पुस्तकातून घेतला आहे. संगीत आणि धर्म, मिथके, वाद्ये, देवत्व यांबद्दल असलेला भारतीय दृष्टिकोन, संगीतात वेगवेगळ्या काळात झालेले अनेक प्रयोग, संगीताच्या कोटी म्हणजेच आदीम संगीत, लोकसंगीत, शास्त्रीय संगीत असे प्रकार, संगीताचे उपयोग, संगीतात कालानुरूप होत गेलेले बदल, यांचे सविस्तर विवेचन या पुस्तकात केले आहे. संगीताच्या अभ्यासकांसाठी तर हे पुस्तक उपयुक्त आहेच पण प्रत्येक संगीतप्रेमीलाही याच्या वाचनामुळे लाभ मिळेल.